मुंबई : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, मुंबई, कोकण किनारपट्टीला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. कोकण परिसरात पावसाचा जोर कायम असून, पुढील तीन दिवस राज्यातील काही भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचा जोर लक्षात घेता संभव्य धोका टाळण्यासाठी आतापर्यंत कोकणातून 4,500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर, 1 जूनपासून राज्यभरात पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 57 जखमी झाले आहेत.
राज्यातील काही भागात येत्या तीन दिवसात भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, बचाव पथकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्तीकाळात सर्व एजन्सींना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच धरणातून विसर्गापूर्वी नारिकांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये 24 तासांत 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद करण्यात आली असून, काही भागात किरकोळ भूस्खलनाचीही नोंद करण्यात आली आहे.