मुंबईः मुंबई पारबंदर प्रकल्प (एमटीएचएल) आणि वरळी-शिवडी मार्गावरील हा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे. रेल्वे रुळांपासून सर्वांत उंच (२२ मीटर) असलेला हा पूल ऑगस्ट २०२३मध्ये पूर्ण होईल, असा दावा महारेलने केला आहे.
मुंबई पारबंदर प्रकल्पाचा मुक्तमार्गाकडे जाणारा जोडरस्ता या पुलाखालून जाणार आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होत आहे. यासाठी या जोडरस्त्याचे काम होण्यासाठी शिवडी रेल्वे उड्डाणपूल उभा राहणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबई पारबंदर प्रकल्प आणि वरळी-शिवडी मार्गाला जोडण्याचे काम हा पूल करणार आहे. नवी मुंबई येथून पश्चिम उपनगरात जाणाऱ्या प्रवाशांचा यामुळे अर्धा तास वेळ वाचणार आहे.
पुलासाठी आवश्यक गर्डरची बांधणी आणि पूल उभारताना विविध बांधकामे आणि केबल हटवण्याचे काम महारेलकडून यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. पुलाचे खांब उभारण्यासाठी पाया खोदण्याचे काम सुरू आहे. तसंच स्टील गर्डरचा वापर करण्यात येणार असल्याने त्यासाठी आवश्यक गर्डर फॅब्रिकेशनचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून MMRDA कडून सर्व मंजुरी मिळाली असून मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग आणि मुख्यालयातून येत्या दोन आठवड्यात मंजुरीची अपेक्षा आहे.