ठाणे : मराठी माणसाने जेव्हा मुंबई हातात घेतली, तेव्हा १०५ लोक न घाबरता बंदुकीच्या गोळ्यांना सामोरे गेले, शहीद झाले. पण आम्ही मुंबई घेतली. तेव्हा आता आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना परत बोलवा, असे म्हणणार नाही तर आता त्यांना पळवून लावू, गरज पडली तर राजभवनात घुसू. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'राज्यपालांना नेहमी आम्ही मानसन्मान देतो. पण आता त्यांची तशी लायकी उरलेली नाही. त्याला मराठी माणसांची किंमत समजली नाही. महाराष्ट्राचे थोर कवी, दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे म्हणतात, "ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर, कष्टकऱ्यांच्या तळहातावर उभी आहे", यातच मराठी माणसाची ओळख आहे'. असे वक्तव्य आव्हाड यांनी केले.
तसेच ते म्हणाले,'आम्ही राज्यपालांबाबत कधी बोलतच नव्हतो. मात्र असे असताना देखील त्यांनी बऱ्याच वेळा महाराष्ट्राचा अपमान केला. तरी फार मी काही लक्ष दिलं नाही. कारण मराठी माणसांना ते काय बोलतात त्याविषयी काही वाटत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी महात्मा फुलेंचा अपमान केला मला वाटतं तेव्हाच त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी होती'.