सोलापूर : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. परंतु, अकोल्यातील काही वारकरी पंढरपूरला जात असताना बीड-उस्मानाबाद रोडवरील पारगावच्या आयआरबी कंपनीच्या टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसुली करण्यात आली.
वारकऱ्यांनी टोल मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असताना वारकऱ्यांकडून टोल मागणी करत असल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान, पैसे मागणी करत असताना हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओत टोल नाक्यावरील कर्मचारी, कोण मुख्यमंत्री?... आधी टोलचे पैसे द्या, आम्हाला टोल माफीचा जीआर मिळाला नसल्याचे सांगत आहेत.