मुंबई: राज्यात सत्तांतर होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, मात्र अजूनही नव्या सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही. तसेच लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा नव्या सरकारचा प्रयत्न आहे, मात्र खातेवाटपाबाबत सरकारमध्ये असलेल्या भाजप आणि शिंदे गटात चर्चा सुरू आहेत. जी ३ खाती शिंदे गटाला हवी आहे ती ३ खाती भाजपलाही हवी आहेत त्यामुळे या तीन खात्यांवरुन मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही.
सुत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शिंदे गटाला ऊर्जा खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग खाते आणि वैद्यकीय शिक्षण खाते अशी तीन खाती हवी आहेत, मात्र या तीन खात्यांसाठी भाजपही आग्रही आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ही तिन्ही खाती भाजपकडे होती, त्यामुळे ही खाती पुन्हा आपल्याकडे रहावी अशी भाजपची इच्छा आहे. मात्र, नगरविकास खाते वगळता शिंदे गटाला इतर कोणतंही महत्वाचं खातं मिळालं नाही, त्यामुळे आता ऊर्जा खातं, सार्वजनिक बांधकाम खातं आणि वैद्यकीय शिक्षण खातं ही तिन्ही खाती आपल्याला मिळावी अशी शिंदे गटाचीही मागणी आहे.
तसेच ठाकरे सरकारच्या काळात ही खाती काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडे होती, आता ही खाती आपल्याला मिळावी अशी भाजपची मागणी आहे. मंत्रिपदाच्या या रस्सीखेचात भाजप आणि शिंदे गटात सुप्त संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा आहे, त्यामुळे या ३ खात्यांवरुन मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही.