मुंबई: मुंबईच्या दहिसरमध्ये दारुच्या नशेत साचलेल्या पाण्यात उतरलेल्या ६ तरुणांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, तर चार जणांना वाचवण्यात यश आले. मात्र बुडालेल्या एकजण अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, हे सहाही तरुण बोरिवलीच्या भीम नगर परिसरातील राहणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ५ जुलैच्या रात्री पावसात हे सहा जण बाहेर निघाले होते. यात पप्पू लखनलाल यादव, आकाश संपत गायकवाड, वय ३१ वर्ष, दीपक जवाहरलाल जयस्वार, वय २१ वर्षे, गणू जवाहरलाल जयस्वार वय १९ वर्षे, शेखर पप्पू विश्वकर्मा, वय २३ वर्षे, अजय बाळासाहेब जोगदंड, वय २० वर्षे हे सहा तरुण बोरिवली पश्चिम येथील गोराई ब्रिज, भीम नगर येथे दारू प्यायला बसले होते. ५ वाजताच्या च्या सुमारास अजय याच्या रिक्षाने हे तरुण या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते.
यावेळी शेखर पप्पू विश्वकर्मा हा २३ वर्षीय तरुण आणि अजय बाळासाहेब जोगदंड हा २० वर्षीय तरुण हे दोघेजण महाराष्ट्र खदानीच्या डॅममध्ये पोहण्यास गेले. खदानीत पोहत हे दोघं मध्यापर्यंत गेले, मात्र ते परत येत असताना पाण्यात बुडू लागले त्यावेळी ते आरडा ओरड करू लागले. तेव्हा त्या दोघांना वाचवण्यासाठी दीपक आणि आकाश हे दोघेजण पाण्यात गेले असता तेही मिळून आले नाहीत. या प्रकारानंतर स्थानिक लोकांना मदतीला बोलवले.
दरम्यान, बुडालेल्या तरुणांपैकी शेखर पप्पू विश्वकर्मा या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह मिळून आला, तर अजय बाळासाहेब जोगदंड, वय 20 वर्ष, याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला.