मुंबई: शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी आज यावर जोरदार वक्तव्य केले आहे. 'या अगोदर आमच्या सरकारला देवेंद्र फडणवीस स्थगिती सरकार म्हणत होते, आता शिंदे-फडणवीस सरकार स्थगिती सरकार होणार आहे का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
तसेच आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, आमच्यावरचा राग या सरकारने मुंबईवर काढू नये. आरेमध्ये आम्ही ८०० एकर जागा फॉरेस्ट म्हणून जाहीर केली आहे. हे सरकार मुंबई विरोधी आहे. मुंबई विरोधात हे सरकार राग व्यक्त करत आहे, असेही ठाकरे म्हणाले.
याशिवाय, हे सरकार आम्ही सुरू केलेल्या प्रोजेक्टला स्थगिती देत आहे, सरकार बदलले म्हणून चांगल्या प्रोजक्टला स्थगिती देणे बरोबर नाही, आपण असल्या जंगलांना संपवले तर अवघड होईल. आपण या जंगलात रस्ते केले आहेत, पण आपण झाडे तोडलेले नाही, असे ठाकरे यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आरे येथे सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली.