पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या नागपूर येथील दोन तरुणांचा चंद्रभागेच्या पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना चंद्रभागा नदी येथील जुन्या दगडी पुलाजवळ घडली. मृत्यू झालेले दोन्ही युवक नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील होते. सचिन शिवाजी कुंभारे (२८, रा. जलालखेडा) आणि विजय सिद्धार्थ सरदार (२७, रा. नारसिंगी) असे मृत तरुणांची नावे आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा व नारसिंगी येथील तीन युवक आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेले होते. रविवारी सकाळी ते रेल्वेने पंढरपुरात पोहचले. आंघोळ करावी व नंतर विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, असा त्यांनी विचार केला. सचिन आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला, पण चंद्रभागा नदीला पाणी जास्त असल्यामुळे सचिनला पाण्याचा अंदाज आला नसल्याने, तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी विजयने नदीत उडी घेतली. त्यालाही पोहणे येत नसल्याने तोही पाण्यात बुडू लागला.
दरम्यान, काठावर बसलेल्या मित्राने ते पाहिले, त्या मित्राने आरडा-ओरडा करत त्यांना वाचवण्यासाठी लोकांना बोलावले. तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्या दोघांना बाहेर काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण डॉक्टरांनी या दोघांना मृत घोषित केले.