मुंबई: 'हिंदुत्वाचा जयघोष करुन सत्तेत आले, मात्र वारकऱ्यांना दिलेलं पहिलंच आश्वासन ठरलं फोल, मुख्यमंत्र्यांची टोलमाफीची घोषणा हवेतच विरली.' असे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सरकारवर टीका केली आहे. येत्या १० तारखेला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मात्र, अकोल्यातील वारकरी पंढरपूरला जात असताना बीड-उस्मानाबाद रोडवरील पारगावच्या RRB कंपनीच्या टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसुली करण्यात आली शिवाय या वाहनधारक वारकऱ्यांना 'शासनाचा जीआर दाखवा तरच टोल माफ केला जाईल', असे देखील टोल वसुली करणारा कर्मचारी म्हटला आहे.
वारकऱ्यांनी टोल मागणाऱ्या कर्मचारी बोलतानाचा एक व्हिडीओ मोबाईलमध्ये शुट केला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत टोल नाक्यावरील कर्मचारी कोण मुख्यमंत्री? आधी टोलचे पैसे द्या, आम्हाला टोल माफीचा जीआर मिळाला नसल्याचे सांगत आहे.
त्यामुळे वारकऱ्यांना देण्यात आलेली टोलमाफी कागदावरच आहे का? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात असतानाच, राष्ट्रवादीने देखील हा व्हिडीओ ट्विट करत शिंदे सरकारवर टीका केली आहे. हिंदुत्वाचा जयघोष करुन सत्तेत आले, मात्र वारकऱ्यांना दिलेलं पहिलंच आश्वासन फोल ठरलं असल्याचं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.