विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या समुद्रकिनाऱ्यावरुन एक विवाहित महिला वाहून गेल्याची माहिती समोर आली होती, पण नंतर समजले की, महिला समुद्रात वाहून गेली नसून, आपल्या प्रियकराकडे पळून गेली.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, श्रीनिवास आणि साई प्रिया नावाची महिला यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण, लग्न झाल्यापासून दोघेही आनंदी नव्हते. साई प्रिया सोमवारी सायंकाळी तिचा पती श्रीनिवाससोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आरके बीचवर आली होती. श्रीनिवास समुद्रकिनारी बसला होता, तर साईप्रिया लाटांजवळ गेली आणि बेपत्ता झाली. श्रीनिवासला वाटले की, ती समुद्राच्या लाटांसोबत पाण्यात वाहून गेली असावी. यानंतर श्रीनिवासने पत्नी पाण्यात बुडल्याची तक्रार दाखल केली. दोन दिवस तिचा शोध घेण्यात आला, मात्र ती काही हाती लागली नाही.
दरम्यान, बुधवारी साईप्रियाच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअॅपवर साई प्रियाचा व्हॉईस मेसेज आला. "मी साईप्रिया बोलतेय, मी जिवंत आहे आणि बंगळुरूला रवी(बॉयफ्रेंड)कडे आली आहे. आम्ही दोघे एकमेकांवर खूप दिवसांपासून प्रेम करतो आणि लग्न करणार आहोत. माझी काळजी करू नका, शोधण्याचा प्रयत्न करू नका. मी खूप थकले आहे, तुम्ही दबाव टाकला तर मी बरं वाईट करुन घेऊन. मला पोलिस आणि प्रशासनाची माफी मागायची आहे. रवीच्या कुटुंबाला त्रास देऊ नका,'' असा मेसेज पाठवून साईप्रिया प्रियकराकडे निघून गेली.