मुंबई: युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला आजपासून सुरुवात झाली. आदित्य ठाकरे यांनी भायखळा येथील शाखा क्र. २१६ ला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, शरद पवारांनी शिवसेना संपवली अशा हास्यास्पद प्रतिक्रिया कोणी देत असतील तर त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, 'जे कोणी मातोश्रीवर येत आहेत त्यांची निष्ठा आम्हाला कळतेय. महाराष्ट्रातील सगळे नागरिक उद्धव साहेबांसोबत उभे आहेत. त्यांनी जो काही आम्हाला धोका दिला आहे त्याबद्दल दुःख नक्कीच आहे. त्यांच्या चेहर्यावरील भाव पाहून मी असेल किंवा उद्धवसाहेब असतील आमच्या सारख्या चांगल्या लोकांना राजकारणात जागा आहे का? हा प्रश्न आता पडला आहे. हे दुर्दैव असल्याचेही ठाकरे या वेळी म्हणाले.
शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न केले अशा हास्यास्पद प्रतिक्रिया कोणी देत असतील तर त्या गोष्टींकड लक्ष देऊ नये. जे काही घडले ते राज्याने नाही तर संपूर्ण देशाने आणि लोकांनी पाहिले की कसे लोकशाहीच्या विरोधात पावले उचलली गेली अशी प्रतिक्रिया त्यांनी शरद पवारांवर केले जाणाऱ्या आरोपांवरती आज दिली.
तसेच आम्ही जेव्हा जागोजागी फिरतो तेव्हा लोक येऊन भेटतात तेव्हा कळते की मागील दोन-अडीच वर्षात जे काही काम झाले ते जनतेनं पाहिले आहे. ज्यांच्यावर विश्वास टाकला ज्यांना आम्ही सर्व काही दिले आणि त्यांनीच आम्हाला धोका दिला. कुठे काय जोडायचे त्याला तुम्हीच पहा; पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की देशात लोकशाही आता राहिली आहे का? अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.