मुंबई: सध्या सरकार स्थापन होऊन एक महिना झाला पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिल्ली रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
बुधवारी दिल्ली दौरा रद्द झाला असे आधी सांगण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाल्याचे माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तासभर चर्चा झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारा संबंधित चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
तसेच, मंत्रिमंडळ विस्तार आणि १ ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. १८ मंत्रिपद शिंदे गटाला देण्यात यावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. तसेच कोर्टाच्या निकालानंतर लगेच मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल असे देखील एकनाथ शिंदे यांनी अमित शहांना सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे.