जळगाव : मित्राच्या भावाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असलेल्या दोघांच्या दुचाकीला भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. अपघात प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील उर्फ आश्विन गोकुळे सोनवणे (वय-२२, रा. हरीओमनगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, निखील उर्फ आश्विन सोनवणे हा तरूण आसोदा रोडवरील हरीओम नगरात वास्तव्याला होता. ७ जुलैला निखील व त्याचा मित्र गणेश भावलाल कोळी (रा. आसोदा रोड जळगाव) असे देाघेही मित्राच्या भावाच्या हळदीचा कार्यक्रमासाठी कुसुंबा येथे दुचाकी (एमएच १९ डीजे ८८४१) ने रात्री गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर निखील आणि गणेश हे दोघे दुचाकीने घरी येण्यासाठी रात्री १२ वाजता कुसुंबा येथून निघाले. दुचाकीने येत असतांना रेमंड चौफुलीजवळून जात असतांना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून येवून जोरदार धडक दिली. या अपघातात निखील सोनवणे याचा मृत्यू झाला. तर गणेश कोळी हा गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, घटनेच्या ११ दिवसानंतर निखीलचे नातेवाईक रतीलाल संतोष सोनवणे (रा. हरीओम नगर, आसोदा रोड, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.