मुंबई: मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले. आज पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकरणीची बैठक सुरु आहे. या बैठकीत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. पण काही वेळानंतर भाषणाचा व्हिडिओ फेसबुकवरुन डिलीट करण्यात आला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, आपल्याला दुःख झाले. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हकायचा होता. सलग पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले आहेत. आपल्याला मुंबई महापालिका जिंकायची आहे, असे वक्तव्य पाटील यांनी केले.
तसेच, जेव्हापासून शपथ घेतली, तेव्हापासून आपण सर्व मुंबईत आहोत त्यामुळे आता चला आपल्या घरी कामाला लागू जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावले जाईल आणि तेही वेळेत होईल. आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ. नेत्यांनी आदेश करायचा नसतो इच्छा व्यक्त करायची असते आणि आपण त्याच पालन करायचे असते, असेही पाटील म्हणाले.