मुंबई : राज्याच्या विविध भागातून सुमारे ४५० नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आले आहेत. विद्यापीठ अधिनियम लक्षात घेता, या महाविद्यालयांच्या प्रस्तावांना मान्यता द्यावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
राज्य सरकारने नवी महाविद्यालये सुरू करण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार राज्यभरातून ४५० नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. विद्यापीठ अधिनियमानुसार नव्या महाविद्यालयांना १५ जुलैपूर्वी मान्यता द्यावी लागते. सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.प्रथम वर्ष पदवीसाठी प्रवेश सुरू झाले आहेत.
मात्र, सरकारची मान्यता न मिळालेल्या महाविद्यालयांना प्रवेश देता येत नाहीत. त्यामुळे त्या भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. येत्या १५ जुलैपूर्वी प्रस्ताव सादर केलेल्या महाविद्यालयातील पात्र ठरलेल्या महाविद्यालयांना मंजुरी मिळाल्यास, त्या भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी येणार नाहीत, असे आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रात नमूद केले आहे.