नवी दिल्ली: शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत. सरन्यायाधीशांच्या या निर्णयामुळे शिंदे गटातील आमदारांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे.
आज शिवसेनेचे हे प्रकरण खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने शिवसेनेच्यावतीने सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना हे निर्देश दिले आहेत. या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी घटनापीठ तयार करण्यासाठी काही अवधी लागणार असल्याचेही सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सुनावणीला वेळ लागणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा आजचा हा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.