भंडारा : सासुरवाडीहून मध्यप्रदेशातील गावी जात असताना दोन तरुण मोटरसायकसह वाहून गेल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. सदरील घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील कवलेवाडा-चिखला रस्त्यावरील नाल्यावर गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. यापैकी एक जण बचावला तर दुसरा बेपत्ता आहे, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आज पहाटेपासून शोधकार्य सुरू केले.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, सारांश मुन्नालाल सुखदेवे (वय २७ वर्ष) रा. खैरलांजी जि. बालाघाट (मध्यप्रदेश) असे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तर रवी सेवक टेकाम (वय ३१ वर्ष) रा. खैरलांजी जि. बालाघाट असे बचावलेल्या तरूणाचे नाव आहे. तुमसर तालुक्यातील बाळापूर हमेशा येथे रवी टेकाम या तरुणाची सासूरवाडी आहे. हे दोघेही तरुण सासुरवाडीला आले होते. रात्री परत चिखला मार्गे ते मध्यप्रदेशातील खैरलांजीकडे जात होते. यादरम्यान, कवलेवाडा-चिखला रस्त्यावरील पुलावरून जात असताना अंधारामुळे पुलावरून पाणी असल्याचे त्यांना दिसले नाही. त्यामुळे दोघेही मोटरसायकलसह पुलावरून पाण्यात पडले. यापैकी रवी टकाम काही वेळात सुखरूप बाहेर आला. सारांश सुखदेवे पाण्यात वाहून गेला. रवीने या घटनेची माहिती तातडीने सासुरवाडीच्या मंडळींना दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्रीची वेळ असल्याने तसेच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पोलिसांना बचावकार्यात अडथळा आला. आज सकाळपासूनच पोलीस बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध घेत आहे.