नवी दिल्ली : आजपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत असल्याने हे अधिवेशन महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. या पावसाळी अधिवेशनात नूतन अध्यक्ष व नूतन उपाध्यक्षांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सभागृहात खुल्या मनाने चर्चा झाली पाहिजे. संसदेत खुल्या मनाने संवाद व्हायला हवा, गरज पडल्यास चर्चाही व्हायला हवी, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
तसेच, पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, मी सर्व खासदारांना विचार करून चर्चा करण्याचे आवाहन करतो. हा काळ खूप महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवाचे हे पर्व आहे. १५ ऑगस्ट आणि येत्या २५ वर्षांचे विशेष महत्त्व आहे. जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करेल, तेव्हा आपला प्रवास निश्चित करण्याचा संकल्प करण्याची वेळ येईल, असेही वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले.