श्रीरामपूर : श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावर गायकवाड वस्तीजवळ असलेल्या श्रीकृष्ण मंदिरासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकरने वडिलांसह दोन मुलांना चिरडल्याची घटना घडली आहे. हा भीषण अपघात आज शनिवारी श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावर सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास झाला. बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड (५०),दीपाली गायकवाड (१८), अजित गायकवाड (२२) अशी मृतांची नावे आहेत. मृत व्यक्ती श्रीरामपूर तालुक्यातील जुने नायगाव येथील रहिवाशी होते.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, बाळासाहेब गायकवाड त्यांच्या मुलांसह श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याने त्यांच्या दुचाकीने प्रवास करीत होते. त्यावेळी श्रीरामपूरच्या दिशेने येणाऱ्या टॅंकरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तिघांनाही जोरदार धडक बसून दिपालीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा अजितला उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले.पण, बाळासाहेबांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर अजितला पुढील उपचारासाठी नेत असतानाही, प्रवासादरम्यान अजितचाही मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची घटना घडल्यानंतर टॅंकर चालकाने पळ काढला. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.