मुंबई : आज एक निश्चित अवघड रस्ता आहे, पण ते आपण पार करू. जे सरकारच्या हातात होतं, ते देखील त्यांनी केलं नाही. एक मंत्रिमंडळ उपसमिती होती, ती नेमकी काय करायची माहित नाही. तत्कालीन मुख्यमंत्री हे वेळ द्यायचे की नाही माहित नाही. आम्ही कोणीही खुर्च्या तोडण्यासाठी आलेलो नाही. तर सत्ता आमचं साधन आहे आणि परिवर्तन घडवायचं आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुढे फडणवीस म्हणाले, 'गिफ्ट पेक्षा सरप्राईज गिफ्ट मिळणं जास्त चांगलं असतं. याचा अनुभव मला आहे. मला माझ्या नेत्यांनी एक सरप्राईज गिफ्ट दिलं. हे गिफ्ट योग्य वेळी मिळणार, त्यांची काळजी करू नका. आता मुख्यमंत्री आणि मी ठरवलं शिवसंग्राम सोडून जितके घटक पक्ष आहेत, त्यांना संधी देण्याचं काम आम्ही करू.
दरम्यान, शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचा जन्मदिवसानिमित्त आणि केलेल्या कार्याबद्दल अभिष्टचिंतन सोहळा हा मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पार पडला. या सोहळ्याला उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, आशिष शेलार आणि इतर भाजप नेते उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला शिवसंग्रामचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत. नुकत्याच झालेल्या विधानरिषद निवडणुकीत मेटे यांना संधी न मिळाल्यामुळे ते नाराज होते. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आगामी काळात संधी मिळावी यासाठी आजचा अभिष्टचिंतन सोहळा असल्याची चर्चा आहे. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.