सांगली : महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचे सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर दिसत असून शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो. अशी भावना जयंत पाटलांची आहे. असा टोला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना लगावला आहे.
यावेळी पडळकर म्हणाले की, 'जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलावर गुन्हे दाखल करायची रचना केली होती'. पण 20 तारखेला विधान परिषदेचा निकाल लागला, त्यानंतर सेना आमदार सुरतला गेलेली बातमी आल्यानंतर जयंत पाटलांचा चेहरा उतरला.
'आजही जयंत पाटलांचा चेहरा बघा आजच्या तारखेपर्यंत त्यांचे सुतक गेले नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे'. असा टोला पडळकरांनी जयंत पाटीलांना लगावला आहे. 'जयंत पाटील सत्ता असेल तर काम करू शकता. सत्तेच्या विरोधात तुम्ही काम करू शकत नाही. शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो. अशी भावना जयंत पाटलांची निर्माण झाली आहे'. अशी टीकाही आमदार पडळकर यांनी केली.
दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर सध्या सांगली दौऱ्यावर आहेत. वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते.