जळगाव : प्रेमाचे खोटे नाटक करून फसवणूक, ब्लॅकमेल करणाऱ्या मुलाने स्वतःही लग्न केले नाही, दुसऱ्याशीही होऊ देत नाही, मुलाची आईनेही नकार दिला. या वेदना असह्य झाल्याने अखेर पीडितेने गळफास घेतला. मृत्यूशी १८ दिवस झुंज देत दिव्याचा बुधवारी (ता. १३) मृत्यू झाला.
मृत तरुणीच्या मोठ्या वडिलांनी (काका) जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या माहितीनुसार, तारखेडा (ता. पाचोरा) येथील दिव्या दिलीप जाधव (वय २१) आई-वडिलांसह गावात राहत होती. आई-वडील हातीमजुरी करून उदरनिर्वाह करतात. गावातील नीलेश मंगलसिंग गायकवाड याने दिव्याशी मुद्दाम ओळख केली. नीलेशने लग्नाचे आमिष दाखवून दिव्याचा प्रेमासाठी होकार मिळविला.
यादरम्यान दिव्याच्या आई-वडिलांनी तिचा विवाह करण्याचा निर्णय घेतल्याने मी लग्न करणार आहे, असे,सांगत नीलेश नेहमीच आडकाठी आणत होता. मुलीच्या अवाडीला प्राधान्य देत सामान्य कुटुंबातील जाधव कुटुंबाने थेट नीलेश गायकवाड यांच्या घरी जाऊन लग्नाबाबत मागणी घातली. मात्र, मुलाच्या आईने स्पष्ट शब्दात नकार देत त्यांना माघारी लावले. त्यानंतर पुन्हा त्यांनी दिव्यासाठी स्थळ शोधमोहीम राबवून एका ठिकाणी बोलणी पक्की केली होती. परंतु, दिव्याचे लग्न दुसरीकडे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कळताच नीलेशने त्याचे दिव्यासोबतचे फोटो, कॉल रेकॉडिंग आणि चॅटिंग त्या मुलाच्या कुटुंबीयांना पाठविण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू केले होते.
तसेच, उलटसुलट व्हॅाट्सॲप चॅटिंगसह त्याचा त्रास, शिवीगाळ, दमदाटी वाढल्याने दिव्याने त्रास असह्य झाल्याने २४ जूनला दुपारी आई-वडील शेतात असताना गळफास घेतला. नातेवाइकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. सलग १८ दिवस मृत्यूशी झुंज देत अखेरीस बुधवारी (ता. १३) दिव्याचा मृत्यू झाला.