सिंधुदुर्ग - आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले. ईडीची चौकशी अजुनही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांना ईडी मार्फत 3 वेळा नोटीस देण्यात आली होती. मात्र या महाशयांनी तिन्ही वेळा वेगवेगळी करणे दिली आणि पळ काढला संजय राउत हे पळकुटे व्यक्ती आहेत. तुम्ही जर काही केलं नसेल पत्रा चाळ घोटाळ्यात तुमचा काही सबंध नसेल तर तुम्ही तीन तीन वेळा ईडी चौकशी का चुकवता? असा प्रश्नही राणे यांनी राऊत यांना केला.
तसेच, ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांची शपथ घेण्यापेक्षा जर तुम्ही इडीला सत्य सांगितले असत तर आजची सकाळ खराब झाली नसती.तुम्ही दररोज येऊन महाराष्ट्राची सकाळ खराब करत होता आज तुमची सकाळ खराब झाली. याशिवाय, स्वप्ना पाटकर च्या ऑडिओ क्लिप मध्ये ती जमीन माझ्या किंवा प्रवीण राऊत याच्या नावावर कर असे संजय राऊत सांगत आहेत. तर मग आता आरोप सिद्ध करायची गरज आहे का? संजय राऊत हे शरण जाणार नाही असे म्हणत आहेत मात्र ही घाण कोणत्याही पक्षाला नको आहे. असे प्रकारचे भाष्य करत नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.