बुलढाणा - अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटोडा येथे शेतीच्या वादामुळे झालेल्या हाणामारीमध्ये एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना घडली. तर या घटनेमध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून ७ आरोपींना अटक केली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील काटोडा शिवारामध्ये वामनराव धुड यांच्या शेताशेजारी गावातीलच बबन भिकाजी थिगळे यांची शेती आहे. त्या शेतीमध्ये काही दिवसांपूर्वी बबन थिगळे यांच्यासोबत धुऱ्यावरुन वाद झाले होते. त्यावेळी बबन थिगळे याच्या विरोधात पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. तेव्हापासून दोघांमध्ये यावरून नेहमीच वाद होत होते. दरम्यान काल शेतकरी वामनराव धूड यांची दोन्ही मुले दत्तात्रय धुड आणि विनोद धूड, भावजयी सुषमा धुड हे शेतामध्ये सोयाबीन लावत असतांना बबन थिगळे सह तीन ते चार जण हे आपल्या शेतामधुन हातात कुऱ्हाड, लाठ्या, काठ्या घेऊन आले.
दरम्यान बबन थिगळे यांने पोलिसात रिपोर्ट का दिला असे म्हणत धूड कुटुंबाला शिवीगाळ करु लागला. तर सोबत असलेल्या तीन ते चार जणांनी यांने आपल्या हातातील कुऱ्हाडीने, लोखंडी रॉडने मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेत धूड बंधू गंभीर जखमी अवस्तेत आपला जिव वाचवत जवळच्याच कवठळ गावी पलायन करत आपल्या नातेवाइकांकडे आसरा घेतला. परंतु, चवताळलेल्या आरोपींनी काटोडा गावात जाऊन जखमी धूड बंधूच्या वृद्ध आई वडिलांनाही घरात घुसून जबर मारहाण केली आणि घरासमोर उभी असलेली चार चाकी गाडी, ट्रॅक्टरच्या काचा फोडल्या.
या घटनेत गंबीर जखमी झालेल्याना उपचारासाठी चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता कूषीवर्ताबाई धूड या ६५ वर्षीय महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जखमी असलेल्या दत्तात्रय धूड यांचे फिर्यादिवरुन अंढेरा पोलीसांनी खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बबन भिकाजी थिगळे, शाम बबन थिगळे, दिपक हनुमान सह इतर पाच जणांचा समावेश आहे.