मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवाजी पार्क येथील महत्वाकांक्षी प्रकल्पात बदल करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या विश्वासातील महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदली झाल्यानंतर ठाकरेंच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये बदल करण्यात येत आहेत.
शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या धूळीच्या प्रदुषणाला रोखण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवाजी पार्क मैदानाचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. यात शिवाजी पार्कच्या नुतनीकरणावरही भर देण्यात आला होता. परंतु, या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले, असतांना धूळीच्या प्रदुषणाची समस्या कमी न होता. अधिक वाढल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर आता शिवाजी पार्क प्रकल्पाच्या सध्याच्या कामात काही महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हे बदल करण्याकरता पुन्हा एकदा रहिवाशांकडून सुचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, प्रकल्पाकरिता असलेल्या कोअर कमिटीची व्याप्तीही वाढवण्यात येणार आहे.
दरम्यान, या प्रकल्पांमध्ये बदल होत असले तरी, प्रकल्पाला स्थगिती देण्याचा कुठलाही विचार नाही. रहिवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन काही बदल केले जातील. असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.