जळगाव: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, ज्या पद्धतीने सरकार स्थापन झाले आहे, त्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आरोप-प्रत्यारोपही मोठ्या प्रमाणात होत आहेत. यातच आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर पडले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झालेली आहे. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात, मी याला योगायोग म्हणेल. एकनाथ खडसे यांच्यामुळेच हा अपशकून घडला, असे अजिबात म्हणणार नाही, परंतु, सोशल मीडियावर असे म्हटले जात आहे. पण हा योगायोग असतो. राजकारणात सत्ताबदल हा चालूच असतो, असे गिरीश महाजन यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले उमेदवार एकनाथ खडसे यांचा विजय झाला. परंतु, महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे खडसे यांना पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी खडसेंविरोधात टीका केली.