अकोले : कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत शिवारात कोल्हार घोटी रस्त्यावर असलेल्या ओढ्यात औरंगाबाद येथील पर्यटकांच्या गाडीला काल रात्री अपघात झाला. वळणाचा अंदाज न आल्याने क्रेटा कार थेट कृष्णवंती नदी पात्रात बुडाली. या अपघातात क्रेटा मधील दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तर तिसरा काचेतून उडी मारून बचावला. त्याचवेळी बोलेरो गाडीतून आलेला एक वृध्द पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णावंती नदीत वाहून गेला. ट्रॅक्टर आणि जेसीबीने गाडी बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद येथील वकिल आशिष प्रभाकर पोलादकर,वय ३४ रा.पोलाद तालुका सिल्लोड, रमाकांत प्रभाकर देशमुख (वय ३७) रा. ताड पिंपळगाव, ता.कन्नड,वकील अनंत रामराव मगर (वय ३६) रा.शिंगी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील युवक संगमनेरला त्यांच्या मित्राकडे कार्यक्रमानिमित्त आले होते. जवळच असणाऱ्या भंडारदरा आहे, तो पाहण्यासाठी ते आले होते. त्यांना भंडारदरा येथे जायचे होते, मात्र त्यांचा रस्ता चुकला ते सरळ वाकी मार्गे वारूंघुशी फाट्याच्या पुढे गेले रस्ता चुकला लक्षात आल्यावर ते रात्री साडेआठ वाजता ते कळसुबाईकडून भंडारदराच्या दिशेने येत होते.
यावेळी पेंडशेत फाट्यावर एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची क्रेटा कार थेट सरकत जाऊन कृष्णवंती नदीपात्रात बुडाली. याचवेळी बोलेरो गाडीतून एक प्रवाशी लघु शंकेसाठी थांबला होता, पण नदीच्या पाण्याचा प्रवाहात तोही वाहून गेला. आज शनिवारी त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
वाचलेला मित्र अनंत आपल्या मित्रांचे मृतदेह पाहून रडू लागला, आणि बेशुद्ध पडला. त्याला राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.