मुंबई : जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले, शिवसेनेतील या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर मुलाखत दिली आहे. ही मुलाखत दै. सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पालापाचोळ्याने इतिहास घडवला आहे. हे जनतेला माहित आहे. इतिहास घडवणारे कोण असतात, हे जनतेने पाहिले आहे. आमची लढाई सत्तेसाठी नाही. आमची लढाई बाळासाहेबांच्या विचारांसाठी होती. बाळासाहेबांच्या विचारांच्या भूमिकेतून आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना पालापाचोळा, पानगळ काय म्हणायचा हा त्यांचा अधिकार आहे . परंतु पुन्हा एकदा सांगतो की, याच पालापाचोळ्याने इतिहास घडवला आहे', असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले.