नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये महाराजगंज जिल्ह्यात एका मुलीने वडिलांवर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितेने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी तिला सहकार्य केले नाही. त्यामुळे तिने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करत वडिलांवर कारवाईची मागणी केली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, महाराजगंज जिल्ह्यातील सिसवामुंशी गावात राहणाऱ्या अली रझा याने दुसरे लग्न केले असून त्याने पहिली पत्नी आणि मुलगी या दोघींना सोडले आहे. त्याची 20 वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत नैनितालमध्ये राहते. पीडित मुलगी आणि तिची आई वडिलांना भेटण्यासाठी महाराजगंज येथे आली होती. मात्र, वडिलांनी मुलीचा मोबाईल नंबर घेऊन तिला पुन्हा घरी बोलावले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबद्दल कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने सांगितले आहे.
दरम्यान, पीडित मुलगी आणि तिच्या आईने या घटनेनंतर एसपी डॉ. कौस्तुभ यांची भेट घेतली. तसेच आरोपी वडिलांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक डॉ. कौस्तुभ यांनी सीओंकडून चौकशी करून गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.