संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात मालवाहू करणारी पिकअप प्रवरा नदी पात्रात वाहून गेली. या पिकअप वाहनात 3 जण असल्याचे समोर येत आहे. हा सर्व प्रकार सोमवारी (१५ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील जोर्वे आणि पिंपरणे या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलावर घडली.आज सकाळी दूध टाकायला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने घटना उघडकीस आली.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून प्रवरा नदीला पूर आला आहे. पुरामुळे अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच सोमवारी रात्री नाशिक येथून निघालेली पिकअप संगमनेर तालुक्यातील ओझर येथे काचा घेऊन आली होती. काचा खाली करून जात असताना पुलावरून नदीपात्रात पडून पिकअप पुराच्या पाण्यात वाहून गेली.या पिकअप वाहनात चालकासह दोन जण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी दुध घालण्यासाठी चाललेल्या शेतकऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. आता वाहून गेलेल्या पिकअपसह गाडीमधील तीन व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे.