जालना : प्राप्तिकर खात्याने जालना जिल्ह्यातील स्टील उत्पादकांवर टाकलेल्या धाडीमध्ये थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली. यात सुमारे 58 कोटींची रोकड, 32 किलो सोने, हिरे आणि इतर ऐवजांचा समावेश आहे.
या मोहिमेबाबात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता बाळगली. 1 ते 8 ऑगस्ट दरम्यान रात्रंदिवस हे छापासत्र सुरू होते. त्यात नाशिक विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकारी सहभागी होते.
प्राप्तिकर विभागाच्या नाशिक अन्वेषण व शोध (डिटेक्शन) विभागांतर्गत औरंगाबादच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील 4 बड्या स्टील कारखानदारांनी आपल्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवले. पण ते पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले. याद्वारे सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचा संशय होता. त्यामुळे नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात 1 ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांतून जाऊन स्टील कारखानदारांवर व्यावसायिकांच्या कार्यालयांसह निवासस्थानावर छापे टाकले.
एकाच वेळी वेगवेगळ्या 5 पथकांनी ही कारवाई केली. त्यात सुरुवातीला काहीच हाती लागले नाही. त्यामुळे या पथकांनी त्यांच्या शहराबाहेरील 8 ते 10 किलोमीटरवरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला. तेथे कपाटांखाली व बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली. आणखी एका व्यावसायिकाच्या घरीही अशीच रक्कम सापडली. जालन्यात मिळालेली रोकड स्थानिक स्टेट बँकेत नेऊन मोजण्यात आली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली मोजणी रात्री 1 वाजेपर्यंत पूर्ण झाली. त्यासाठी 10 ते 12 यंत्रे लागली. 35 कापडी पिशव्यांत नोटांची बंडले पॅक केली.
🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा