अमरावती: अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नदीच्या पुरामध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन पाच जण वाहून गेले होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने त्यांचे मृतदेह शोधून काढले. मोरोती शेषराव चौके, रा. धर्मापुर (मुलगा) तर शेषराव दौलतराव चौके रा.धर्मापुर (वडील) असे मयत व्यक्तींची नावे आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नदीच्या पुरामध्ये ट्रॅक्टर उलटून पाच जण वाहून गेले होते. मात्र, त्यामध्ये दोघांना पोहणे येत असल्याने ते त्याच वेळी सुखरूप बाहेर आले. तर एकाने संपूर्ण रात्र झाडावर काढत तो दुसऱ्या दिवशी घरी परतला.
दरम्यान, दोन दिवसापासून दोघेजण बेपत्ता असताना आज वडील व मुलाचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने आज शोधून काढले असून दोन्ही मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.