सांगली : मिरज तालुक्यातील तुंग येथे १३ ऑगस्टरोजी रात्रीच्या सुमारास प्लॉट दाखविण्याचे आमिष दाखवून सांगलीत एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, माणिकराव विठ्ठल पाटील (५४) रा. राममंदिर, सांगली असे अपहरण झालेल्या व्यावसायिकांचे नाव आहे. पाटील यांचा जमीन खरेदी करून त्यावर बांधकाम करण्याचा व्यवसाय आहे. १० ऑगस्टपासून त्यांच्या मोबाईलवर एक व्यक्ती फोन करीत होता. सदर व्यक्ती तुंग परिसरात प्लॉट पाहण्यास येण्यासाठी आग्रह करीत होता. त्यामुळे पाटील यांनी १३ ऑगस्ट रोजी येतो, असे सांगितले.त्यानंतर त्या व्यक्तीने त्यादिवशी सायंकाळी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला त्यामुळे पाटील यांनी रात्री येतो असे सांगितले. त्यानुसार ते कारने तुंगला गेले. मिणचे येथील मळ्याशेजारी भारत बेंझ शोरूमसमोर पाटील यांनी कार लावली. तेवढ्यात अपहरणकर्ते तिथे आले. पाटील यांना प्लॉट दाखवितो, असे सांगून त्यांच्या कारमध्ये बसले. तेथून त्यांना घेऊन निघून गेले.
दरम्यान, पाटील हे रात्री उशिरापर्यंत घरी आले नाहीत. मुलगा विक्रमसिंह यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. पण मोबाईल बंद लागत होता, दुसऱ्यादिवशी सकाळीही ते आले नाहीत. घरच्यांनी १४ आणि १५ ऑगस्टपर्यंत पाटील यांची प्रतीक्षा केली. मात्र ते आलेच नाही. त्यामुळे विक्रमसिंह ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी तुंगमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील CCTV फुटेज ताब्यात घेऊन तपासणी केली. यामध्ये पाटील हे मिणचे मळ्याजवळ कार लाऊन उभे होते. तसेच अपहरणकर्ते त्यांच्याजवळ आले. थोडा वेळ त्यांच्याशी बोलून ते कारमध्ये बसून पाटील यांना घेऊन गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कार सांगलीच्या दिशेने आली असल्याचे CCTV तपासणीत दिसत आहे. मात्र, कारचा क्रमांक दिसत नाही. रंगावरून तर कार पाटील यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुलगा विक्रमसिंह यांच्याकडून अधिक माहिती घेतली जात असून लवकरच या घटनेचा छडा लावला जाईल, असे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सांगितलं आहे.(सौ. साम)