मुंबई - राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. यानंतर आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी वर्षा गायकवाड यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांचा मुद्दा उपस्थित केला.
शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघाताची सरकारने चौकशी लावली आहे, मात्र इतर महामार्गावरही अपघात होत आहेत. अनेक अपघात हे खड्ड्यांमुळे होतात. कोकणातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. माझ्या डोळ्यांसमोर त्या दिवशी खड्ड्यांमुळे एक अपघात झाला. याबाबत शासन काय धोरणात्मक निर्णय घेणार आहे, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मेटेंच्या अपघाती निधनाबाबत अनेक गोष्टी कार्यकर्ते व त्याच्या पत्नींनी माझ्यााजवळ उपस्थित केल्या आहेत. मेटेंच्या चालकाने ओव्हरटेक केल्यामुळे अपघात झाला. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ही घटना घडली. याबाबत विस्तृत माहिती समोर आल्यावरच बोलता येईल. मात्र गंभीर बाब म्हणजे मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही असे म्हटले गेले.
मात्र चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मुंबई व रायगड पोलीस त्यांचा रस्त्यात शोध घेत होते. मात्र एक प्रवासी मदतीसाठी थांबला. त्याने IRB कडे मदत मागितल्यावर ७ मिनिटांत मदत मिळाली. मात्र ही यंत्रणा चुकीची आहे.
अशा वेळी अपघात झाल्यानंतर थेट लोकेशन मिळणे सोपे होते, अशी यंत्रणा उभी करण्यावर आम्ही भर देणार आहोत. मार्गिका सोडून चालणाऱ्या ट्रेलरवर कारवाई करणार असून मार्गिका सोडून जाणाऱ्या ट्रेलरची माहिती मिळाल्यास थेट कारवाई करता येईल अशी यंत्रणा उभी करणे गरजेचे असून त्यावर आम्ही अत्याधुनिक टेक्नोलाॅजीचा वापर करणार आहोत, असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.(सौ. साम)