वर्धा : जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे बैल पोळ्याच्या दिवशी गोठ्याला अचानक आग लागल्याने आगीत गोठ्यातील दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला. सोबतच गोठ्यातील विविध साहित्याची राखरांगोळी झाल्याने शेतकऱ्यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, धनोडी (बहाद्दरपूर) येथील शेतकरी सतीश रामकृष्ण सोनवणे यांनी गावाशेजारील गोठा उभारला आहे. या गोठ्यात जनावरांसह जनावरांचे वैरण आणि शेती उपयोगी विविध साहित्य ठेवले जायचे. गुरूवारी पोळा सणाचे औचित्य साधून रात्रीला गोठ्यात बांधून असलेल्या बैलांचे खांद शेकल्यावर शेतकरी घरी परतला.मात्र नंतर अचानक रात्री दीड ते दोन वाजता दरम्यान गोठ्याला आग लागली. यात गोठ्यातीलच दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेमुळे शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासकीय मदती मागणी गावकऱ्यांनी केली आहे.