नवी दिल्ली: १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देश स्वातंत्र्य झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर दरवर्षी लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान ध्वजवंदन करतात. याशिवाय १५ ऑगस्टला सरकारी कार्यालये आणि शाळा कॉलेजांमध्ये ध्वजवंदन केले जाते.
ध्वजवंदन करण्याची योग्य पद्धत आणि नियम खालीलप्रमाणे:
१५ ऑगस्टला ध्वजवंदन केले जाते आणि २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकावला जातो. ध्वजवंदन आणि झेंडा फडकावणे या दोन्ही बाबी वेगळ्या आहेत. जेव्हा तिरंगा खालील बाजूने दोरीच्या साह्याने खेचून फडकावला जातो, तेव्हा ध्वजवंदन म्हटले जाते. मात्र, २६ जानेवारी रोजी ध्वज आधी वरच्या बाजूला बांधला जातो. तिथेच तो फडकावला जातो. त्याला ध्वज फडकावणे म्हटले जाते.
भारतीय ध्वज हाताने कातलेला, सूती, रेशीम किंवा खादी कपड्यापासून हाताने विणलेला असावा. ध्वजाची लांबी आणि रुंदी ही ३:२ अशी असावी.
ध्वजवंदन करताना झेंडा अर्धवट झुकलेला असताना फडकावू नये. कोणताही आदेश नसताना तिरंगा अर्ध्यावर फडकावला जाऊ शकत नाही.
कुणाला सलामी देण्यासाठी तिरंगा झुकवला जाऊ शकत नाही.
राष्ट्रीय ध्वजामध्ये कोणत्याही प्रकारचे छायाचित्र, पेंटिंगचा वापर करू नये.
फाटलेला आणि मळलेला झेंडा प्रदर्शित करू शकत नाही.
राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जाऊ शकत नाही.
कागदांचा तिरंगा असेल तर, तो योग्य ठिकाणी ठेवावा.
दरम्यान, राष्ट्रीय ध्वज फडकावण्याची योग्य वेळ सूर्योदयापासून सूर्यास्ताच्या आधी असते. सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी तिरंगा उतरवायला हवा. तिरंगा नेहमी अशा जागी फडकवा, जेणेकरून तो सगळ्यांना स्पष्टपणे दिसेल.
तसेच, राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केला किंवा अवमान होईल अशी कृती केली तर, त्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते.