मुंबई: नालासोपारा धानिवबाग परिसरात राहणारी एक १५ वर्षीय मुलगी सहा दिवसांपुर्वी नाल्यात वाहून गेली होती. बेपत्ता झालेली मुलगी आता उत्तर प्रदेशमध्ये आढळून आली आहे. दिक्षा यादव असे या वाहून गेलेल्या मुलीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, १६ ऑगस्ट रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे धानिवबागच्या सिद्धिविनायक चाळीत राहणारी दीक्षा दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पावसात घराबाहेर शौचालयास गेली असता, याच वेळी उघड्या नाल्याजवळ तिचा पाय घसरून ती नाल्यात पडली आणि पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्याचे समजले होते.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन करून देखील दिक्षा हिचा काही थांगपत्ता लागला नव्हता. मात्र, जवळपास सहा दिवसानंतर आज दिक्षाचा फोन तिच्या आईला आला, ती नाल्यात वाहून गेली नसून उत्तर प्रदेशमधील गाजीपुर येथे आहे आणि सुखरूप असल्याचे तिने फोनवर सांगितले आहे. तसेच, दिक्षा ही नाल्यात वाहून गेली नसून उत्तर प्रदेश येथे पळून गेली असल्याचे सांगण्यात येत आहे.