तळेगाव: महिलेने लग्नाचा तगादा लावल्याने तिचा सुपारी देऊन खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. बजरंग मुरलीधर तापडे, पांडुरंग बन्सी हारके, सचिन प्रभाकर थिगळे, सदानंद रामदास तुपकर अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
माहितीनुसार, मावळ मधील तळेगाव येथे नऊ ऑगस्टला महिलेचा खून झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तळेगाव दाभाडे व आसपासच्या परिसरात तपास सुरु केला. या तपासात बजरंग तापडे हा संबंधित महिलेला ओळखत असल्याचे समोर आले. त्याची अधिक चाैकशी करून पोलिसांनी तापडे याला अटक केली.
महिलेचे आणि तापडे याचे संबध हाेते. तिने लग्नासाठी तगादा लावला. मात्र, तापडे हा विवाहित असल्याने तसेच त्याला तीन मुले असल्याने त्याने लग्नाला नकार दिला होता. परंतु महिलेचा तगादा सुरुच राहिला. त्यामुळे, संबंधित महिला स्कूटीवरून घरी येत असताना संशयित आराेपी तिथे आले व त्यांनी स्कूटी अडवून महिलेस खाली उतरवून तिचे केस पकडून धारदार चाकूने गळा चिरून तिचा खून केला. त्यानंतर तेथून सर्वांनी पळ काढला.
दरम्यान, अशी माहिती पोलिसात तपासात समोर आली असून यातील तीन संशियतांना गुन्हे शाखेने तर सदानंद तुपकर याला तळेगाव पोलिसांनी अटक केली.