मुंबई : राज्यातील प्रलंबित शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. आज पहिल्या टप्प्यात भाजपच्या ९ आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, पहिल्या टप्प्यात मंत्रिपदाची माळ गळ्यात न पडल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी ज्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार नव्हतं, त्यांची समजूत काढत होते. त्याचवेळी संजय शिरसाटांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्या बंडखोरांनी मागचा पुढचा विचार न करुन तुम्हाला मदत केली, त्यांच्याच वाट्याला मंत्रिपद नाही, अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी बैठकीत पाच ते दहा मिनिटं तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावरील शिंदे गटातील आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलेल्या आमदारांमध्ये नाराजीचा उद्रेक झाल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट हे मंत्रिपदाची संधी हुकल्यामुळे प्रचंड नाराज झाल्याचे समजते.