नागपूर: शिंदे गटाच्या बंडाळीनंतर आदित्य ठाकरे राज्यातील विविध जिल्ह्यात दौरे करत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना शिंदे सरकारवर निशाणा साधत आहेत. आज आदित्य ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्यातील नांदगाव गावातील समस्या जाणून घेत शिंदे सरकारवर टीका केली.
आदित्य ठाकरे म्हणाले, 'मला माहित नव्हतं या गावात एवढा मोठा प्रश्न आहे. गावात वीज निर्मिती होते. त्यामुळे लाईट मिळते. मात्र, त्यामागे नागरिकांचे किती नुकसान होते हे गावात आल्यावर पाहायला मिळाले. गावात आलो, तेव्हा सर्व ठिकाणी राख पाहायला मिळत होती. पिण्याच्या पाण्यात राख होती. मी डम्पिंग बंद केलं. मात्र, आता हे सरकार काय करेल मला माहित नाही. 'मी पर्यावरण मंत्री असताना अनेक प्रश्न सोडविले. त्याचा पाठपुरावा करत राहणार. मला इथले लोक फोटो पाठवत होते. त्यावरून मला कळायला लागलं. गावातील राख लोकांचे जीवन खराब करत आहे. मात्र, तीच राख सोनं सुद्धा होऊ शकते. मात्र, आतापर्यंत त्यावर कोणीच काम केलं नाही.मला लाज वाटते की, या ठिकाणी राखेमुळे एवढं नुकसान होतं. मात्र, कोणीच त्यावर काही करत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उर्जामंत्री देखील आहेत. त्यांना भेटून मी या समस्यांना सांगणार आहे', असे आदित्य ठाकरे यानी वक्तव्य केले.
दरम्यान, आदित्य ठाकरे हे नागपूर जिल्ह्यातील नांदगाव या गावात गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले होते. खापरखेडा वीज प्रकल्पातून राखेमुळे या गावात अनेक समस्या निर्माण झाले आहेत. गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.