मुंबई - येणारा पाऊस धो-धो पडला तर तो दिसतो. पण सरकारी धोरणं जे तलवार चालवतात त्याचे काय? आम्ही सगळे मिळून कसायासारखे शेतकऱ्याला हळूहळू कापतो ते दिसत नाही. आम्ही सगळेच नालायक, आमच्याएवढे नालायक कुणीच नाही. जखम झाल्यावर त्यावर मीठ टाकणारी आपण औलाद आहोत. उगाच पावसाचे नाव बदनाम करायचे अशा शब्दात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत घणाघात केला.
बच्चू कडू म्हणाले की, अतिवृष्टीवर आपण चर्चा करतो पण धोरणावर कुणी चर्चा करत नाही. पाऊस एकदा पडून निघून जातो परंतु राजकारण्यांनी बनवलेली धोरणं शेतकऱ्यांना आत्महत्येपर्यंत घेऊन जातात हे तपासून पाहिले पाहिजे. आज इकडचे तिकडे गेले. सत्ता बदलली पण प्रश्न तेच आहेत. बोलणाऱ्यांचे चेहरे बदलतात. जेवढं नुकसान अतिवृष्टीने झालं नाही त्यापेक्षा जास्त नुकसान धोरणामुळे झाले आहे असे त्यांनी सांगितले.