मुंबई: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. यानंतर आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. सभागृहात 'आम्ही काय केलं की घोडेबाजार आणि तुम्ही काय केलं की शॉपिंग, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी भाजपला टोला लगावला.
धनंजय मुंडे म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासहित एकूण ४० आमदारांना घेऊन गेले आणि मुख्यमंत्री झाले. रिक्षावाला पासून राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांचे नगरसेवक देखील चाहते झाले. पण ज्यावेळी नगराध्यक्ष जनतेतून निवडून येणार असे सांगितले, त्यावेळी शिंदे यांचे चाहते नगरसेवक नाराज झाले. हे ४० जणांना घेऊन मुख्यमंत्री झाले, मग आमची संधी का हिरावली असा सवाल त्यांच्याकडून होत आहे'.
तसेच ते पुढे म्हणाले, 'एवढं करून भाजपने काय मिळवलं, हे कळालं नाही. कमीत कमी विरोधीपक्ष नेते पदावर बसले होते, ते पद संवैधानिक होते. जर उपमुख्यमंत्रिपद संवैधानिक नाही, मग तुम्ही काय मिळविले ? मुख्यमंत्री देखील जनतेतून होऊ द्या. १२० आले तरी विरोधीपक्षात राहावे लागले. सत्ता आली तरी उपमुख्यमंत्रिपदी बसावे लागले. आम्ही काय केलं की घोडेबाजार आणि तुम्ही काय केलं की शॉपिंग ?, असा सवाल करत धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.