रत्नागिरी: गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यासाठी पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नारळी पौर्णिमेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा राज्यात जोर वाढणार आहे. मुंबईत ७ आणि ८ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज तर ९ आणि १० ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. मराठवाड्यात ९ आणि १० ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.