मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागितली आहे. कोश्यारी यांनी मुंबईबाबतच्या आपल्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली आहे. एक प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांनी ही माफी मागितली आहे. माझी चूक झाली माफ करावे असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांचा माफीनामा खालीलप्रमाणे:
प्रसिद्धीसाठी निवेदन
दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.
भगत सिंह कोश्यारी राज्यपाल, महाराष्ट्र