मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे पहिल्या पावसाळी अधिवेशनातील पहिले तीन दिवस वादळी ठरले आहेत. आज चौथा दिवस आहे. दरम्यान, काल मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना करुणा शर्मावरुन अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. यावरून आज विधान सभेत बोलताना प्रत्येकाने बोलताना मर्यादा पाळायला हवी अशा शब्दात अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे.
अजित पवार म्हणाले, 'आम्ही सभागृहात जागृत राहून काम करत असतो. काही जण बोलता बोलता समोरून प्रतिसाद मिळाला तर एखादा शब्द त्यांच्या तोंडून जातो. पण प्रत्येकानं बोलताना एक मर्यादा ठेवायला हवी. आपल्याकडून काही चूक होऊ देता कामा नये, तसेच, सभागृहात आरोप-प्रत्यारोप होतच असतात. आम्ही आमची भूमिका मांडतो असतो, सत्ताधारी पक्ष त्यांची भूमिका मांडतात. फक्त माझं मत आहे की वैयक्तिक निंदा-नालस्ती कधीच कुणी कुणाची करू नये. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामाचा एक दर्जा आहे, असे अजित पवार यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, काल विधानसभेत बोलताना अगोदर आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावर उत्तर देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला. 'तुमचा सगळा प्रवास मला माहीत आहे, देवेंद्र फडणवीस यांनी एकदा दया, माया, करुणा दाखविली पण परत परत दाखविता येणार नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी मुंडेंना टोला लगावला होता. यावर आज अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे.