मुंबई: “जर, तुम्ही नगराध्यक्ष आणि सरपंच जनतेनं निवडणार असाल, तर मुख्यमंत्री सुद्धा का निवडत नाही? अशी विचारणा अजित पवार यांनी केली. तसेच, ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर होत नाहीत किंवा पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. मात्र इतर निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होतात. त्यामुळे, ज्यांच्याकडे पैसा आहे, मनी मसल आहे त्यांचीच दहशत राहील. त्यामुळे हा पायंडा लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे हे बिल रद्द करण्यात यावे, असे अजित पवार यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारडून काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली, तर काही निर्णय रद्दच करण्यात आले आहेत. यामध्ये नगराध्यक्ष तसेच सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णयाचा समावेश आहे. या निर्णयावरून आज विधानसभेमध्ये शिंदे फडणवीस सरकारवर विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच छगन भुजबळ यांनी सडकून टीका करत या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली.