मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. त्यामुळे भाजपा-मनसे युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अशातच भविष्यात राजकारणात काहीही होऊ शकते असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी केले आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, पूर्वीच्या कालखंडातील भाजपा आणि आत्ताच्या भाजपात जमीन आस्मानचा फरक आहे. पहाटेच्या वेळीस अजित पवारांना घेऊन देवेंद्र फडणवीस शपथ घेतील असं वाटलं नव्हतं. त्यानंतर एकनाथ शिंदे ५० आमदार घेऊन बाहेर पडतील ते देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार बनवतील असं वाटलं नव्हतं. राजकारणात भविष्यात काहीही होऊ शकतं. त्यामुळे भाजपा-मनसे एकत्र आल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं खडसेंनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्यात सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थ निवासस्थानी जात राज यांची भेट घेतली. त्याचसोबत इतर भाजपा नेतेही राज ठाकरेंची भेट घेत आहेत. त्यामुळे भाजपा-मनसे युती होणार का अशीच चर्चा राज्यातील जनतेमध्ये आहे.