पुणे: राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत येऊन महिना उलटला पण तरीही अजुन मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, यावरुन आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आज मंत्रिमंडळ विस्तारावरुन टीका केली. 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तोंडातून लवकरच, लवकरच, लवकरच इतकेच शब्द येत आहेत. होईल, होईल.. पण कधी होईल याचे उत्तर यांच्याकडे नाही, असा जोरदार टोला पवार यांनी लगावला.
यावेळी अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तोंडातून लवकरच, लवकरच, लवकरच इतकेच शब्द येत आहेत. होईल, होईल.. पण कधी होईल याचे उत्तर यांच्याकडे नाही. महाराष्ट्रात चांद्यापासून ते बांद्यापर्यंत अनेक प्रश्न आहेत. अतिवृष्टी, पाऊस, शिक्षणाशी संबंधित पालक आणि विद्यार्थ्यांसमोरील अडचणी आहेत याची जबाबादारी कोण घेणार,असेही अजित पवार यांनी वक्तव्य केले.
तसेच, मंत्रिमंडळाचा विस्तार दिल्लीतील सिग्नलशिवाय होईना. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सध्या मदत हवी आहे, त्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणाची आहे, असे प्रश्न करणारे भाष्यही पवार यांनी केले.