मुंबई: शिंदे-फडणवीसांचे सरकार शेतकरी विरोधी असून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.भाजपविरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत होते. आता या सरकारवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यावेळी नाना पटोले म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी आहे. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत जाहीर केल्याचे सांगून राज्य सरकार फसवणूक करत आहे. एनडीआरएफचे निकष जुने आहेत. आता खताच्या किमतीही तिप्पट झाल्या आहेत.
बी-बियाणे, खते, किटकनाशकांचे भावही वाढलेले आहे. या महागाईच्या तुलनेत सरकारने जाहीर केलेले मदत अत्यंत कमी आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केंद्र सरकारनेही हात वर करून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आहे. आमची मागणी कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार रुपये व बागायती, फळबागेसाठी १.५ लाख रुपये आहे ती राज्य सरकारने तात्काळ द्यावी, असे वक्तव्य नाना पाटोळे यांनी केले.