मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पालिकेचे प्रशासक या नात्याने आपल्यावर पालिकेची ही भ्रष्टाचारी ओळख पुसण्याची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. तर आदित्य सेनेच्या टक्केवारी गँगमुळे पालिका भष्ट्राचारासाठी चर्चेत असल्याचे म्हणत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.
या पत्रात नितेश राणे यांनी लिहले आहे की, 'सातत्याने मुंबई महानगर पालिका ही आदित्य सेनेच्या टक्केवारी गँगमुळे भष्ट्राचारासाठीच चर्चेत राहिली आहे, म्हणूनच प्रशासक या नात्याने आपल्यावर पालिकेची ही भ्रष्टाचारी ओळख पुसण्याची जबाबदारी आहे.
पण मुंबई उच्च न्यायलायाने घाटकोपर येथील पश्चिम किरोळ गावातील एका इमारत पुनर्विकास प्रकल्पांतर्गत जलवाहिनीची सुविधा नसताना महापालिकेने अंशत: भोगवटा प्रमाणपत्र (पार्ट ओसी) दिले, यावर महापालिकेच्या भ्रष्टाचारी कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले आहेत.
महापालिकेचे प्रशासक म्हणून आपले अधिकार हे केवळ बदली करता मर्यादित नसून अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मुभा देतात. नेहमीप्रमाणे दुर्घटना आणि जिवीतहानी झाल्यानंतर मुंबई प्रशासनाला जाग येते हा समज दुर करणे हे प्रशासक म्हणून आपल्याकडून अपेक्षित असल्याचं राणे यांनी पत्रात म्हटले आहे.